शालेय जीवन हे नेहमीच अविस्मरणीय असते. काही सुखद तर काही कटू आठवणी असतात. मी एकुण तीन शाळांमधे शिकलो. सर्व प्रथम महाराणी चिमणाबाई शाळा, बड़ोदा. नंतर सोमलवार हायस्कूल, नागपूर आणि सरते शेवटी पटवर्धन हायस्कूल, नागपूर. महाराणी चिमणाबाई शाळेच्या माझ्या आठवणी नगण्य आहेत. मला माझा वर्ग, मित्र काहीच आठवत नाही. मला इतकेच आठवते की वयाच्या पाचव्या वर्षी मी तिथे दूसरीत शिकत होतो. त्यापूर्वी बहुतेक मोठ्या बहिणीने घरीच शिकवले असावे. त्याकाळी पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचे बंधन नव्हते. सयाजी गंज मधील घर ते शाळा जवळपास एक मैलाचे अंतर होते. मी एकटाच शाळेत जायचो, फुटपाथवर अशोकाची झाडे होती, हातात दफ़्तर घेऊन रस्ता क्रॉस करायचो, सुखरूप जायचो आणि परतायचो. त्याकाळी शाळेची बस अथवा पालकांनी शाळेत नेणे आणणे नव्हतेच.
नोव्हेंबर १९५२ मधे माझे वडील आयकर आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही नागपूरला परतलो. धंतोलीत आमचे घर होतेच. नागपूराला जरा स्थिरस्थावर झाल्यावर डिसेंबर महिन्यात वडील मला सोमलवार हायस्कूल मधे घेऊन गेले. शाळेचा शिपाई अदबीने आम्हाला हेडमास्तरांच्या खोलीत घेऊन गेला. धोतर, टोपी, कोट अशा पेहरावात सहा फूट उंचीच्या भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या वडीलांनी शाळेच्या हेडमास्तरांना सांगितले की हा माझा मुलगा ह्याला तिसरीत बसवा. हेडमास्तरांनी शिपायाला बोलावले आणि फर्मावले की ह्याला तिसरीत नेऊन बसव. आणि मी त्या क्षणापासून सोमलवारमधे तिसरीचा विद्यार्थी झालो. शाळेत प्रवेशासाठी आजच्यासारखे इंटरव्हू नाही की डोनेशन नाही. शाळा घरापासून मैल दीड मैल दूर होती. मला एनएच ७ हा हायवे क्रॉस करावा लागायचा. मी एकटाच शाळेत जायचो. खांद्यावर दफ्तर एका हातात टिफिन आणि दुसऱ्या हातात शाईची बाटली, पायात चप्पल आणि कोणतीही हाफपॅंट शर्ट घालून स्वारी शाळेत जायची. ठराविक गणवेश नव्हता.
मूळचे रामटेकचे असलेले बर्डे मास्टर आजही स्मरणात आहेत. तिसरी ते आठवी अशी जवळपास सहा वर्षे मी सोमलवार मधे होतो. मी सातवीत असतांना एकदा गणिताच्या पाठक मास्तरांनी मला बदडले आणि मी शाळेत जाणेच बंद केले. एक आठवडा मी घरीच होतो. माझे शाळेत न जाण्याचे कारण आईला ठाऊक होते. तिने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मी शाळेत जायला तयारच नव्हतो. शेवटी झाला प्रकार वडिलांना समजला, त्यांनी माझा हात धरला आणि बळजबरीने शाळेत आणले. शाळा सुरु होऊन बराच वेळ झाला होता, परत एकदा हेडमास्तरांच्या ऑफिसमधे गेलो. हेडमास्तर त्यांच्या खोलीत होते, 'ह्याला वर्गात पाठवा' असे वड़ीलांनी फर्मावले, आणि परत एकदा शिपाई मला वर्गात घेऊन गेला. मास्तरांच्या विरुद्ध काही तक्रार नाही किंवा काही आक्षेप नाही. मुला पेक्षा शाळेवर, मास्तरांवर अधिक विश्र्वास. आजच्या काळात हे दुर्मिळच. असे प्रकार जर आज घडले तर शाळेविरुद्ध किंवा मास्तरांविरुद्ध पालक, मीडिया, आणि एन. जि. ओ. वादळ उठवतील. पोलीस तक्रार केली जाईल आणि बिचाऱ्या मास्तराचा बळी जाईल. छड़ी लागे छमछम..... ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. आठवीं पर्यंत मी सोमलवार मधे होतो. खेळ, नाटक किंवा इतर उपक्रम नव्हतेच. कदाचित मी त्यात भाग घेतला नसेल. शाळेतील मित्र वगैरे फारसे नव्हते. शेजारची समवयस्क मुले इतर शाळांमधे होती. आठवी नंतर मी निर्विकार मनाने शाळा बदलली.
माझे सर्व मोठे भाऊ पटवर्धन शाळेत होते. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी त्याच शाळेतून मॅट्रिक करावे. या शिवाय मुख्य कारणं म्हणजे पटवर्धन ही त्याकाळी प्रख्यात शाळा होती आणि शाळेत त्याच वर्षापासून टेक्निकल मॅट्रिक सुरु होणार होते. टेक्निकल मॅट्रिकच्या त्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी होतो. चाळीस मुलांची बॅच होती (पटवर्धन फक्त मुलांची शाळा होती). इलेक्ट्रीकल इंजीनियरिंग, मेक्यानिकल इंजीनियरिंग, इंजीनियरिंग ड्रॉइंग, सुतारकाम, लोहारकाम असे विषय मॅट्रिकच्या इतर विषयांसोबत होते. थोडक्यात काय तर अभ्यासाचा भरपूर ताण होता. इंजीनिरियरिंगच्या विषयांसाठी सकाळी दहा ते बारा आमचे वर्ग नार्मल स्कूल येथे भरत. त्यानंतर आम्ही दोन मैल दूर असलेल्या पटवर्धन शाळेत इतर विषय शिकण्यासाठी जायचो. सोमवार ते शुक्रवार असाच दिनक्रम असायचा. फक्त शनिवारी सर्वांसोबत शाळा भरायची. त्यामुळे शाळेची प्रार्थना, 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' ही आम्ही फक्त शनिवारीच म्हणायचो. उलट्या यू (U) च्या आकारांत कौलारु शाळा होती. सभोवताल ओसरी (वरण्डा), त्या मागे वर्ग आणि एक कोपऱ्यात हेडमास्तरांची खोली होती. मधल्या मोकळ्या जागेत प्रार्थना व्हायची. इतर विद्यार्थ्यांना आमचे कौतुक असायचे कारण प्रार्थनेसाठी आम्ही फक्त शनिवारीच त्यांच्या सोबत आसयचो आणि त्यांच्यापेक्षा वेगळेच विषय शिकायचो. कालांतराने रस्ता रुंदीकरणासाठी ही ईमारत पाडली गेली. मला हे कळले तेंव्हा मनस्वी दू;ख झाले.
साडे पांच पर्यंत मी घरी परतायचो. शाळेचे खेळायचे मैदान माझ्या घरा शेजारीच होते. घरी जाऊन दफ्तर टाकले, दोन घास गिळले की मी पटवर्धन ग्राउंडवर खेळायला हजर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी भरपूर खेळलो. एन. सि. सि. परेडस् आणि कॅम्पस्, स्नेहसम्मेलने आणि घरुन ताट वाटी नेऊन झालेली सहभोजने, हस्त लिखीताचे संपादन अशा अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. पटवर्धन शाळेत तीन वर्षे धमाल केली. खूप खेळलो, खूप मित्र जोडले. आणि खूप काही शिकलो. उबगडे हेडमास्तर, कुलकर्णी सर, देशमुख मॅडम, देव सर, देशपाण्डे सर, पीटी इंस्ट्रक्टर कडू ह्यांच्याकडून खूप सकारात्मक शिकलो तर मेक्यानिकल इंजिनियरिंग शिकवण्याऱ्या मेश्राम मास्तरांकडून जातीवादाचे रूप पाहण्यास मिळाले. आयुष्याला वळण देण्यास पटवर्धन मधील तीन वर्षे फार महत्वाची ठरली.
तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. स्वागतार्ह गोष्ट आहे. पण या विकासमूळे मुलांचे बालपण हरवले आहे. मैदानी खेळ, पारंपारिक खेळ ह्यांच्याकडे कळत नकळत दुर्लक्ष झाले. आजच्या पिढीच्यापण शालेय जीवनातील आठवणी राहतील पण त्या फार वेगळ्या असतील. आमच्या पिढीला दीड आण्यात मिळणाऱ्या सहा पाणी पुऱ्या आठवतील तर आजच्या पिढीला पन्नास रुपयांचा बर्गर आठवेल. आम्ही खो खो, हूतूतु बद्दल बोलू तर आजची पिढी वीडियो गेम्सच्या गमंती उराशी बाळगेल. गैर काहीच नाही, काळानुरूप बदल झाले आहेत. पण चांगले की वाईट हे कोण आणि कसे ठरवणार?
![]() |
| १९५५ सालचा माझा टिफिन |
माझे सर्व मोठे भाऊ पटवर्धन शाळेत होते. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी त्याच शाळेतून मॅट्रिक करावे. या शिवाय मुख्य कारणं म्हणजे पटवर्धन ही त्याकाळी प्रख्यात शाळा होती आणि शाळेत त्याच वर्षापासून टेक्निकल मॅट्रिक सुरु होणार होते. टेक्निकल मॅट्रिकच्या त्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी होतो. चाळीस मुलांची बॅच होती (पटवर्धन फक्त मुलांची शाळा होती). इलेक्ट्रीकल इंजीनियरिंग, मेक्यानिकल इंजीनियरिंग, इंजीनियरिंग ड्रॉइंग, सुतारकाम, लोहारकाम असे विषय मॅट्रिकच्या इतर विषयांसोबत होते. थोडक्यात काय तर अभ्यासाचा भरपूर ताण होता. इंजीनिरियरिंगच्या विषयांसाठी सकाळी दहा ते बारा आमचे वर्ग नार्मल स्कूल येथे भरत. त्यानंतर आम्ही दोन मैल दूर असलेल्या पटवर्धन शाळेत इतर विषय शिकण्यासाठी जायचो. सोमवार ते शुक्रवार असाच दिनक्रम असायचा. फक्त शनिवारी सर्वांसोबत शाळा भरायची. त्यामुळे शाळेची प्रार्थना, 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' ही आम्ही फक्त शनिवारीच म्हणायचो. उलट्या यू (U) च्या आकारांत कौलारु शाळा होती. सभोवताल ओसरी (वरण्डा), त्या मागे वर्ग आणि एक कोपऱ्यात हेडमास्तरांची खोली होती. मधल्या मोकळ्या जागेत प्रार्थना व्हायची. इतर विद्यार्थ्यांना आमचे कौतुक असायचे कारण प्रार्थनेसाठी आम्ही फक्त शनिवारीच त्यांच्या सोबत आसयचो आणि त्यांच्यापेक्षा वेगळेच विषय शिकायचो. कालांतराने रस्ता रुंदीकरणासाठी ही ईमारत पाडली गेली. मला हे कळले तेंव्हा मनस्वी दू;ख झाले.
साडे पांच पर्यंत मी घरी परतायचो. शाळेचे खेळायचे मैदान माझ्या घरा शेजारीच होते. घरी जाऊन दफ्तर टाकले, दोन घास गिळले की मी पटवर्धन ग्राउंडवर खेळायला हजर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी भरपूर खेळलो. एन. सि. सि. परेडस् आणि कॅम्पस्, स्नेहसम्मेलने आणि घरुन ताट वाटी नेऊन झालेली सहभोजने, हस्त लिखीताचे संपादन अशा अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. पटवर्धन शाळेत तीन वर्षे धमाल केली. खूप खेळलो, खूप मित्र जोडले. आणि खूप काही शिकलो. उबगडे हेडमास्तर, कुलकर्णी सर, देशमुख मॅडम, देव सर, देशपाण्डे सर, पीटी इंस्ट्रक्टर कडू ह्यांच्याकडून खूप सकारात्मक शिकलो तर मेक्यानिकल इंजिनियरिंग शिकवण्याऱ्या मेश्राम मास्तरांकडून जातीवादाचे रूप पाहण्यास मिळाले. आयुष्याला वळण देण्यास पटवर्धन मधील तीन वर्षे फार महत्वाची ठरली.
तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. स्वागतार्ह गोष्ट आहे. पण या विकासमूळे मुलांचे बालपण हरवले आहे. मैदानी खेळ, पारंपारिक खेळ ह्यांच्याकडे कळत नकळत दुर्लक्ष झाले. आजच्या पिढीच्यापण शालेय जीवनातील आठवणी राहतील पण त्या फार वेगळ्या असतील. आमच्या पिढीला दीड आण्यात मिळणाऱ्या सहा पाणी पुऱ्या आठवतील तर आजच्या पिढीला पन्नास रुपयांचा बर्गर आठवेल. आम्ही खो खो, हूतूतु बद्दल बोलू तर आजची पिढी वीडियो गेम्सच्या गमंती उराशी बाळगेल. गैर काहीच नाही, काळानुरूप बदल झाले आहेत. पण चांगले की वाईट हे कोण आणि कसे ठरवणार?
